ढाक-बहिरीचा थरार

Dhak Bahiri Trek
घनगड किल्ला केल्यानंतर आता सगळ्यांची खाज कशी कमी करावी म्हणून आम्ही ढाक बहिरी हा किल्ला निवडला.उन्हाचा तडाखा हा खूपच असल्याकारणामुळे काही जनाने येणे कॅन्सल केले,शेवटी आमचे दरवेळचे सवंगडी घेऊन आम्ही ढाक बहिरी किल्ला करायचा करायला ठरवलं.दिवस ठरला 24 मार्च शनिवारी रात्री निघायचं ठरलं.शेवटी शनिवारी सगळे म्हणजे आमचे सवंगडी म्हणजेच किरण,चेतन,स्वप्नील,जयेश,राहुल,राकेश,दिनेश,सुधीर,आणि लक्ष्मी हे रात्री ०१ वाजता भांडुप स्टेशनला येऊन भेटले व आमची तिथूनच आमची ढाक बहिरीची ट्रेक सुरु झाली.
काही वेळच्या प्रवासानंतर आम्ही सांडशी गावाच्या येथे येऊन पोचलो.रात्रीचे ४ वाजले असल्याकारणामुळे सगळ्याने आराम करण्याचे ठरवले,सगळ्यांचा आराम हा सकाळी ६ वाजता संपला.काही वेळातच सगळ्यांनी तोंड धुऊन ब्रेड आणि मायोनीस,वेफर वरती हात मारून किल्ल्याच्या दिशेने चालू लागले.काही वेळातच आम्ही गावाला पाठी टाकून एका रानमाळावर पोचलो होतो.समोर दिसणार दृश्य काही वेगळाच अनुभव देत होता.समोर उभा ठाकलेला ढाकच्या किल्ल्याच्या सरळसोट कातळ त्याच्याच बाजूला असणारा कलकराईचा सुळका मनात धडकी भरत होता.समोर अजून थोडे अंतर चालून गेल्यावर आम्हाला आता समोर राजमाची किल्ल्याचे विलोभनीय दृश्य दिसले.समोर होते ते आकाशाला भिडणारे श्रीवर्धन आणि मनरंजन किल्ला.सकाळी बोचरी थंडी अंगाला जाणवत होतीच,तरीही आम्ही एका मागोमाग एका गृहस्थाला रस्ता विचारून आम्ही ढाक बहिरीच्या किल्ल्याकडे वाटचाल चालू केली.
जसे जसे आम्ही एक एक डोंगर वरती चढू लागलो तसं तसं ढाक बहिरीच्या किल्ला खूपच लांब जात आहे असं वाटू लागले कारण काही मित्र खूपच दमले होते.तशी मनाला एक हुरहूर लागली होती कि आपण रस्ता तर विसरलो नाही,मन सारखं बोलत होते कि यार एक गावातला माणूस पडून आणला पाहिजे होताच.शेवटी आता काय त्याचा फायदा आम्ही किमान दोन डोंगर चढून आता तिसऱ्या डोंगरात पोचलो पण अजुनपर्यन्त काही ढाक बहिरीच्या किल्ल्याची सावलीही आम्हाला दिसत नव्हती.शेवटी काही वेळ तसाच पुढे चालत चालत एका पठारावर आलो तर समोरच ढाक बहिरीच्या कातळकड्याचं दर्शन झालं.मनातल्या मनात त्या कातळ कड्याकडे बघून अजून भीती वाटू लागली.मी स्वतःच्या मनाला विचारलं कि मी हा कातळकडा चढून वरती जाऊ शकतो का???
काही वेळ आम्ही तितूनच कातकड्याकडे पाहत उभा राहिलो कारण काही सवंगडी अजून पाठीच राहिले होते.पठारावरून त्या कातळकड्यवरुन चढणारी माणसं एका मुंगी प्रमाणे भासत होती.जश्या मुंग्या आपल्या दाना पाणी शोधल्यानंतर सगळ्या एका रांगेत चालू लागतात तसेच काही त्या कातळकडयांवर दिसत होते.काही वेळातच आमचे सगळे मित्र आले आणि परत एकदा ढाक बहिरीची वाट आम्ही पकडली.
आता मात्र उभा चढ होता,एका धबधब्याच्या वाटेतून आम्हाला जायचं होत,काही वेळातच आम्ही कसेबसे ती वाट पार करून ढाक बहिरीच्या पायथ्यला येऊन पोचलो.
ढाक बहिरचा पहिला चढाव हा खूप सोपा वाटलं,त्या चढावानंतर लगेच पादुका लागल्या त्या पादुकांना नमस्कार करून आम्ही तिथेच थोडा वेळ आराम करून पुढे कातळाच्या साह्याने कलकराईच्या सुळक्या कडे निघालो.तो कातळटप्पा पार केल्यानंतर आम्हाला तिकडे काही मोठ्या आकाराच्या गुफा दिसल्या आणि समोरच कलकराईच्या सुळक्या दर्शन झाले.त्याला पाहून असे वाटले कि हा सुळका कधीही आपल्या अंगावर येऊ शकतो.थोडा वेळ आम्ही तिथेच फोटो काढून ढाक बहिरीकडे निघालो,
आता मात्र आमचा कस लागणार होता,आमचे काही मित्र वरती गेले आणि आता लक्ष्मी त्या कातळकडयांवर खोदलेल्या पायऱ्या चढू लागली आणि अचानक म्हणाली कि मी हे नाही करू शकत आणि खाली उतरली.परत काही उशिराने तिने परत तोच कातळकडा पुन्हा चढण्याचा प्रयत्न केला आणि त्यात सफल झाली.पहिला पडाव आम्ही सगळ्याने पूर्ण केला आता मात्र दुसरा पडाव हा खूपच कठीण होता.पूर्ण कातळकड्याला अंग घासूनआम्ही सगळे जण हळू हळू पुढे सरकू लागलो.काही वेळातच आम्ही एका कातळात रोवलेल्या एका झाडाच्या खोडाच्या इथे येऊन पोचलो.त्याच खोडाच्या व त्याच्या फांद्यांच्या जोरावर एका हातात रोप पकडून वरती चढायचं होत.काही मिनिटातच आम्ही सगळे हळूहळू वरती आलो.वरती गुफेजवळ आल्यानंतर खाली पाहिल्यानंतर सगळी माणसं लहान वाटू लागली.
आता आम्ही ढाकबहिरीच्या गुफेजवळ येऊन पोचलो.याच गुहेत बहिरीचा शेंदुर फासलेला दगड आहे. पाण्याची २ मोठी टाक आहेत. या टाक्यांमध्येच गावकयांनी जेवणासाठी काही भांडी ठेवली आहेत.येथे तुम्हाला पिण्याच्या पाण्याची सोया होऊन जाते.काही वेळ तिथेच आराम करून मंदिरातल्या पुजाऱ्या बाबांसोबत गप्पा मारून आम्ही परतीच्या वाटेल लागलो.आमच्या आधी काही लोक खाली उतरत होती.सगळ्यांच्या आधी आम्ही लक्ष्मीला एका रोपच्या साह्याने खाली उतरवलं.अरे हो तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं कि ज्या ठिकाणी दुसऱ्या पडावच्या वेळी मी माझी बॅग तिथेच ठेऊन आलो होतो आणि आम्ही गुफेतून खाली पाहिलं तर एक माकड त्या बॅगेसोबत मस्ती करत होत कारण त्यात खाऊ होता पण त्यात महागडा असं कॅमेरा होता,खूपच आरडाओरडा करून सुद्धा त्याने ती बॅग काही सोडली नाही शेवटी त्याने त्यातला खाऊ काढला व बॅग तिथेच ठेऊन पळून गेला.ते बघून माझ्या मनाला खूपच बरं वाटलं नाहीतर होत परत एकदा नवीन कॅमेराला खर्च.कारण जर ती बॅग तिथून खाली पडली असती तर त्या कॅमेराचा कोणताच भाग शिल्लक नसता राहिला.
काही वेळातच आम्ही सगळेजण खाली उतरून आलो त्या वाटेने पुढे चालू लागलो,आता मात्र दुपारचे १२ वाजून गेले होते,ऊन डोक्यावर येत होते.अंगाची लाही लाही होत होती.आमच्याकडे पाणीही शिल्लक नव्हते.कसे तरी करून आम्हाला अजून तीन तास हा डोंगर खाली उतरायचं होता.काही तासाने आम्ही उतरून आलो तेवढ्यातच लक्ष्मीला चक्कर आल्यासारखी वाटू लागली.कारण पाणी नसल्याकारणाने आणि डोक्यावरती कडक ऊन असल्याकारणामुळे तिला चक्कर येत होती,कसे तरी आम्ही तिला खाली पठारावर आणलं त्यानंतर लगेचच पुढे गेलेय सुधीरला फोन करून गाडी आणि पाणी घेऊन बोलावलं.काही मिनिटातच तोही बिचारा गाडी घेऊन आला.आता मात्र लक्ष्मीला पाणी पाजलं आता तिला थोडासा आराम मिळाला.कारण पाणी कुणाजवळही पाणी नसल्याकारणामुळे सगळ्यांची हालत खूपच बेकार झाली होती.
Laxmi The Brave Girl
जे मित्र पुढे गेले होते मात्र त्याने गावातच एका घरातच जेवणाची सोय केली होती.एवढ्या थकव्या व पायपिटीनंतर सगळ्याने डाळ,भात,पिठलं,भाकरी ह्यावर हात साफ करून करून घेतला.सगळ्यांचा पोटोबा आता शांत झाल्यावर काही वेळ तिथेच आराम करून किमान चार वाजता आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना झालो.काही तासातच आम्ही आता सगळे आपापल्या घरी सुखरूप घरी पोचलो.
पोहोचण्याच्या वाटा :
१) मुंबईमार्गे सांडशी गाव :-. सांडशी गाव संपल्यावर एक वाट पठारापर्यंत घेऊन जाते. या वाटेने १० मिनीटात आपण एका डोंगरापाशी पोहोचतो. येथून सरळ उभ्या डोंगराची वाट पडून चालावे. सांडशी गाव ते ढाक बहिरी हे अंतर कापण्यासाठी साधारणत अडीच ते तीन तास लागतात.
२) जांभिवली मार्गे :- पुणे - कामशेत - जांभिवली यामार्गे जांभिवली गावात पोहोचावे. तेथुन अर्धा - पाऊण तासात कोंडेश्वर मंदिरात पोहोचावे. येथून‘कळकरायचा सुळका’ आणि बहिरीचा डोंगर यामधील खिंडीत तासभरात पोहोचता येते.

Comments

Popular posts from this blog

Rajamachi Trek

Sankshi Fort

वासोटा एक अभूतपूर्व प्रवास